भारताच्या इतिहासातील सोनेरी दिन ......स्वातंत्र्य दिन

Source :    Date :15-Aug-2021
भारताच्या इतिहासातील सोनेरी दिन ......स्वातंत्र्य दिन 
 
15August_1  H x
 
तिरंगी झेंडा फडफडे ,
जय जय कार बोला !
१५ ऑगस्ट आज ,
आमचा देश स्वतंत्र झाला !
               इंग्रजांच्या पारतंत्र्याच्या जोखडातून भारत माता मुक्त झाली तो सोनेरी दिवस म्हणजेच १५ ऑगस्ट १९४७ !! या दिवसाला भारताच्या इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व आहे. हा दिवस भारताचा "स्वातंत्र्य दिन" म्हणून साजरा केला जातो. हा एक भारतातील राष्ट्रीय सण आहे. या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकवला जातो. देशभरातही बहुतांश ठिकाणी ध्वजारोहण, मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो.भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात योगदान असलेल्या सर्व ज्ञात-अज्ञात व्यक्तींचे कृतज्ञतापूर्वक स्मरण या दिवशी केले जाते.
           यंदाचा स्वातंत्र्यदिन खास आहे ;कारण भारताला स्वातंत्र्य मिळून तब्बल ७५ वर्षे पूर्ण होत आहेत.यावर्षी आपण ७५ वा स्वातंत्र्य दिन म्हणजेच "अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन" साजरा करीत आहोत. कोरोना विषाणू जरी कमी झाला असला तरी तिसऱ्या लाटेची शक्यता पाहता ,आणि आरोग्याचा विचार करता सरकारने घालून दिलेल्या नियमातच या वर्षीचा स्वातंत्र्य दिवस साजरा केला गेला.
            डोंबिवलीतील नामवंत शिक्षण संस्था म्हणजे राष्ट्रीय शिक्षण संस्था !!!! या संस्थेच्या स्वामी विवेवेकानंद शाळांमध्ये हा दिवस दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा होतो. १४ ऑगस्ट रोजी मोठ्या उत्साहात ‘समूहगीत’ स्पर्धांचे आयोजन केले जाते. आणि या दिवशी उत्तम प्रकारे सादरीकरण करण्यात आलेली समूहगीते प्रत्यक्ष स्वातंत्र्य दिना दिवशी सादर करण्यात येतात .ऑगस्ट महिना सुरु झाला की विद्यार्थ्याना वेध लागतात ते या समूहगीत स्पर्धेचे!!! सर्व वर्गांत देशभक्ती गीतांचे सूर कानी पडू लागतात.आपल्याच वर्गाच्या समूहगीताचे सादरीकरण उत्तम प्रकारे कसे करता येईल यासाठी वर्गशिक्षक व विद्यार्थी यांचे प्रयत्न सुरु असतात.प्रत्यक्ष समूहगीत स्पर्धेच्या दिवशी असणारे ते देशभक्तिमयी वातावरण ,विद्यार्थ्यांचा उत्साह व जल्लोश ,त्यांच्यात लागलेली ती चढाओढ....आणि मग प्रत्यक्ष स्पर्धेच्या निकालानंतरचे विद्यार्थ्यांचे रुसवे-फुगवे !! कोरोनाच्या जागतिक संकटामुळे या सर्वाला मुकावे लागले. तरीसुद्धा विद्यार्थ्यांचा या दिवशीचा उत्साह व जोश कमी होऊ नये म्हणून Online "देशभक्ती गीत गायन" स्पर्धेचे आयोजन करण्याचा निर्णय शाळेचे मुख्याध्यापक श्री. सुनित वारके यांनी घेतला. देशभक्ती गीतांच्या सादरीकरणा संबंधित सर्व सूचना विद्यार्थ्यांना Whatsapp च्या माध्यमातून पाठविण्यात आल्या .शानिवार दिनांक १४ ऑगस्ट २०२१ रोजी इयत्ता १ली ते इयत्ता ७वीच्या विद्यार्थ्यांसाठी Online ‘देशभक्ती गीत गायन स्पर्धा’ आयोजित करण्यात आली.
              विद्यार्थ्यांनी आपल्या देशभक्ती गीतांचे चित्रीकरण करून Whatsapp च्या माध्यमातून सदर चित्रीकरण वर्गशिक्षकांना पाठवले.कोरोनाच्या प्रतिकूल परिस्थितीत ,उपलब्ध साहित्याचा वापर करून विद्यार्थ्यांनी अतिशय उत्तमप्रकारे गीतांचे सादरीकरण केले.मुख्याध्यापक श्री.सुनित वारके व सर्व शिक्षक यांनी सहभागी विद्यार्थी व त्यांचे पालक यांचे कौतुक केले.

रंग बलिदानाचा त्या तिरंग्यात पहावा,
उत्साह देशप्रेमाचा अंगी संचारावा,
जयघोष भारताचा आसमंती गुंजावा,
सण हा स्वातंत्र्याचा सदैव चिरायु व्हावा !!!